धारावी येथे गुरु रविदास महाराज जयंती भक्तिभावात साजरी
मुंबई-(प्रतिनिधी)समतेचे प्रणेते, मानवमुक्तीचे दीपस्तंभ जगतगुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६५० जयंतीनिमित्त गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघाच्या वतीने धारावी येथे आयोजित करण्यात आलेला जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला.
या प्रसंगी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज स्मारक (शिल्प) येथे पुष्प अर्पण सोहळा पार पडला. उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व समाजबांधवांनी संत रविदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शिल्पाला अभिवादन केले.
कार्यक्रमात संत रविदास महाराजांनी दिलेला समता, बंधुता, मानवता व स्वाभिमानाचा संदेश यावर उपस्थित वक्त्यांनी आपले विचार मांडले. त्यांच्या विचारांची आजच्या समाजाला अत्यंत गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमास समाजातील जेष्ठ नागरिक, युवक, महिला, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम शांततापूर्ण व यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघाच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

