पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचारी मुख्यमंत्री सहायता निधीस देणार एक दिवसाचे वेतन
मुंबई-राज्यामध्ये सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे महापुराचे संकट ओढावले असून, अनेक जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ पडला आहे. अनेकांची घरे, शेती, जनावरे व उपजिविकेची साधने वाहून गेल्यामुळे हजारो कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील नागरिकांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने सर्व शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन आपत्तीग्रस्त बांधवांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्यातील सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचे निर्देश चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण व सरचिटणीस बाबाराम कदम यांनी दिले.
कर्मचाऱ्यांच्या या कर्तव्यभावनेने केलेल्या सहकार्यामुळे पुरग्रस्तांचे झालेले नुकसान भरपाईसाठी मोठा हातभार लागणार असून, आपत्तीग्रस्त बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याबाबतचे निवेदन आज मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिले असून, त्याच्या प्रती शासनाचे मुख्य सचिव आणि अपर मुख्य सचिव (वित्त) यांना दिले असल्याची माहिती चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिली.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

