अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे मंत्रालय कर्मचारी संघटनेचे आवाहन
अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे मंत्रालय कर्मचारी संघटनेचे आवाहन
मुंबई-(संतोष शिंदे)-राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय कर्मचारी संघटनेने राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांचे घर, शेती, जनावरे आणि उपजीविकेची साधने वाहून गेली आहेत.
या संकटाच्या काळात सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने आणि सामूहिक जबाबदारी स्वीकारत मंत्रालय कर्मचारी संघटनेने सर्व कर्मचाऱ्यांना एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस (Chief Minister’s Relief Fund) देऊन आपत्तीग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
आपला छोटासा त्याग आणि सहकार्य हे पूरग्रस्तांना नवसंजीवनी देणारे ठरेल. मंत्रालयीन कुटुंब एकदिलाने या आपत्तीच्या काळात पुढे येईल, असा मला विश्वास आहे असे मंत्रालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र सुळाबाई रामदास मंजुळे यांनी म्हटले आहे.
आपत्तीवर मात, मंत्रालयीन कुटुंबाची साथ या घोषवाक्याखाली हे आवाहन करण्यात आले असून, राज्यातील पूरग्रस्त बांधवांच्या पुनर्वसनासाठी ही मदत मोठा हातभार ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

