कर्जत (YTIET) येथे करिअर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
दिपक कायंदेकर-(प्रतिनिधी) नवी मुंबई,
कर्जत-सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचलित यादवराव तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (YTIET), कर्जत यांच्या वतीने आयोजित करिअर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा-2026 हा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात, दिमाखदार वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअरच्या विविध संधी, प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील मान्यवर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली.
या कार्यक्रमास डॉ. नंदकुमार तासगावकर, अध्यक्ष, सरस्वती एज्युकेशन सोसायटी यांची प्रमुख प्रेरणा लाभली. श्री. पराग ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी सरस्वती एज्युकेशन सोसायटी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच जयवंती जनार्दन कोलंबे (सरपंच, नसरापूर ग्रामपंचायत), अंकुश गोविंद बागडे (उपसरपंच, नसरापूर ग्रामपंचायत), रीना रवींद्र धस (सदस्या, नसरापूर ग्रामपंचायत), उत्तम चंदू कोलंबे (मा. सभापती, रायगड जिल्हा परिषद), राम कमळू कोलंबे (माजी सरपंच) तसेच स्वप्ना कुंभार देशपांडे (मान्यवर वक्त्या) यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. निलेश पवार, प्राचार्य, YTIET कर्जत हे उपस्थित होते.
आपल्या मनोगतात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व विकास, तांत्रिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व पटवून दिले. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी योग्य करिअरची निवड करून स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाच्या विविध शाखा, प्रवेश प्रक्रिया, शासकीय शिष्यवृत्ती योजना, रोजगाराच्या संधी, उद्योग क्षेत्रातील वाढत्या मागण्या तसेच उद्योजकतेच्या संधी याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
यावेळी बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. हरीश बरापात्रे, प्रा. समाधान पाटील, प्रा. रवींद्र जाधव, प्रा. योगिता जांभळे आणि डॉ. संतोष वानखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रा. सुजाता जगताप, प्रा. राजन नेमाडे, रामदास बागडे आणि सदाशिव मुने यांनी समन्वयक म्हणून कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केले.
या कार्यक्रमामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व करिअरच्या संधींबाबत योग्य दिशा मिळाली असून, YTIET संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती आली.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

